प्रिया आहे का ????
आवाज आला म्हणून मी वर बघितले. त्यांच्याजवळ उठून गेले आणि त्यांना सांगितले....
या ना काकू घरात... ती बाहेर गेलीय, येईलच एवढ्यात....
मी औपचारिकता पार पाडली. आणि त्यांच्याकडे बघत स्मित देत मी परत मोबाईल मध्ये बघू लागली.....
काय करतेय मोबाईल मध्ये.......
मी मान वर केली आणि त्यांना सांगितले....
काही नाही काकू, फ्रेंड शी बोलतेय.....
माझं नजर जरी मोबाईल मध्ये असली तरी माझे लक्ष त्या काकूंच्या हालचालीवर होते.... एक हात दुसऱ्या हातात दाबत, पायाला उगाच झटके देत होत्या. मी मुद्दामच त्यांना म्हणाले,
खूप महत्वाचे काम होते का तिच्याकडे????
नाही नाही..... अगदीच फार नाही पण....
हा काकू मी फोन केला असता पण तिने मोबाईल घरीच ठेवलाय.....
काही हरकत नाही, मी बसेल....
मी ओळख नसतांनाही त्यांच्याकडे बघून स्मित देत होती पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळाच खेळ सुरू होता....
काकू, काही बोलायचं आहे का?????
खर तर हो, मी असं ऐकलय की तू......
मी मोबाईल बाजूला ठेवला आणि त्यांना परत म्हणाले,
काय ऐकलय.....
तू लिहतेस ना.. .
हो, म्हणजे थोडं फार लिहते.....
तुला एक गोष्ट सांगू, तू लिहणार का????
अर्थातच काकू, पण ती वाचकांना आवडेल अशी असेल तर नक्की लिहणार......!
मी सांगते, लिहायचं की नाही ते तू ठरव.....मला काय कळतंय त्यातले.....
होय काकू, तुम्ही सांगा मला ....
त्या कोण होत्या, कुठून आल्या मला काहीही ठाऊक नव्हते.ताई ओळखते की नाही हे पण माहीत नव्हते....पण कुठेतरी मन म्हणाले त्यांचे ऐकावे.. त्यांनी मला सांगायला सुरुवात केली आणि मी शब्दन शब्द ऐकून घेतले.....
काकू सांगत होत्या....
एक मुलगी, जिचे शिक्षण, परीक्षा याच्याशी काहीही संबंध नाही, ती म्हणजे वैशाली..... पंधरा सोळा वर्ष होते न होते की तिच्या आई बाबांनी तिला बोहल्यावर चढण्याचे स्वप्न दाखवले.... काय योग्य काय अयोग्य हे विचार करण्याची मानसिकता तर होती पण परवानगी नव्हती....म्हणून तीनेही अगदी आज्ञाधारी पणे आईवडिलांचे म्हणणे ऐकले, आपलं लग्न होईल, राजकुमार तर नाही पण राजकुमारासारखा एखादा मुलगा आपल्या आयुष्यात येईल, आपल्याही गळ्यात मंगळसूत्र सजेल, पायात जोडवी शोभून दिसेल, हिरव्या चुड्याच्या आवाजाने माझा राजकुमार झोपेतून जागा होईल, माझ्या पैंजणाची छनछन माझ्या राजकुमाराला भुरळ घालेल, माझे नटने त्याला एक नवी ऊर्जा देणार......आणि मी ही इतर सुवासिनी प्रमाणे सगळ्यात मिरवणार....असे आणि बरेच स्वप्न वैशाली बघू लागली. वडिलांनी दिलेला शब्द पाळला. वैशाली साठी राजकुमाराची शोधाशोध सुरू झाली..अशातच एक स्थळ घरच्यांना आवडले आणि वैशाली च्या मनात बसले. विवाहाची गडबड सुरू झाली आणि अशातच शुभमंगल सावधान ऐकायला आले, तसेच अक्षतांचा वर्षाव वैशाली आणि तिच्या राजकुमाराच्या अंगावर होऊ लागला..... मोठ्या आनंदाने तिने माप ओलांडून घरात प्रवेश केला. आम्ही सून नाही लक्ष्मी आणली असे बोल कानावर ऐकू येऊ लागले. अशातच सगळ्या मुलींच्या स्वप्नाचा एक भाग म्हणजे मधुचंद्राची रात्र.....त्या दिवशी नवरा जरा अस्वस्थ वाटत होता, म्हणून ती रात्र नवऱ्याचे पाय चेपण्यातच गेली. दुसऱ्या दिवशी नवरा स्वतःहून जवळ आला म्हणून तिचेही मन जरा हर्षले.....तिने आपले सर्वस्व त्याच्या नावाने बहाल केले. आज खऱ्या अर्थाने ती स्त्री झाली होती. असेच काही दिवस गेले. नवऱ्याचा अस्वस्थ पणा वाढतच चालला होता. काय करावे हे वैशाली ला समजत नव्हते. नवरा दवाखान्यात जायला टाळाटाळ करत होता,घरचे कानावर घेत नव्हते. असे करत करत लग्नाला तीन महिने होऊन गेले.शेवटी वैशाली ने जबरदस्ती करत दवाखाना जवळ केला. सगळ्या टेस्ट केल्या आणि रिपोर्ट डॉक्टर सांगत असताना वैशाली जागच्या जागी कोसळली जेव्हा तिला समजले, " आपल्या नवऱ्याचे वाल निकामी झाले आहे....आणि तेव्हा तर वैशाली अधिकच हैराण होती जेव्हा डॉक्टर म्हणाले, तुमच्या नवऱ्याचे वाल गेले हे त्यांच्या घरातील सगळ्या व्यक्तींना आधीच ठाऊक होते.... ती एक जिवंत आत्मा बनली होती. तिचे शरीर थंडगार झाले होते. हे गोष्ट जेव्हा तिच्या माहेरी समजली तेव्हा माहेरच्यांनी अनेक प्रश्न मांडले पण एकही प्रश्नाचे समाधान काही झाले नाही तेव्हा वडील म्हणाले, " वैशाली तू इथे राहून काही फायदा नाही, आपण घटस्फोट घेऊ. झाले, सगळे जण तिची बॅग भरू लागले पण सासरच्या मंडळींनी वैशाली ला थांब, जाऊ नकोस म्हणण्याची तसदी घेतली नाही. वडिलांनी जेव्हा वैशाली चा हात धरला तेव्हा वैशालीने उत्तर दिले...
" मला कुठे घेऊन जाणार बाबा, ज्याचा अंश माझ्या पोटात आहे "?????? वडिलांचा हात नकळत सुटला, आता कसे हा प्रश्न छळू लागला..तेव्हा वडिलांनी समर्पक उत्तर दिले,
" आम्ही तुला अन तुझ्या अंशाला पोषणास समर्थ आहोत" तुझ्या नवऱ्याने, आणि घरच्यांनी तुला धोका दिलाय त्याची परतफेड आपण करूच"
वैशाली ने उत्तर दिले,
जिथे मी सर्वस्व दिले तिथेच प्राण अर्पण करेल...... आपण काळजी करता त्याची मला जाण आहे परंतु माझे सगळ माझे सासर आहे तेव्हा आपण मला सोबत येण्याचा आग्रह करू नये....
वडिलांना शब्द बोचले आणि एकावेळी अभिमान ही वाटला. ते निघून गेले आणि आयुष्याने परीक्षा घ्यायला सुरुवात केली. दिवसामागून दिवस जात होते,तसे तिच्या पोटाचा आकारही वाढत होता, नऊ मास झाले आणि वैशाली ला कन्यारत्न प्राप्त झाले. दिसायला सुंदर अशा मुलीचे ऐश्वर्या असे नाव ठेवले. काम, नवरा, घर आणि ऐश्वर्या एवढेच वैशालीचे विश्व बनले. अशातच काहीच दिवसात वैशाली ला पुन्हा दिवस गेले, एका गोंडस मुलाने जन्म घेतला. आणि काहीच दिवसात वैशालीच्या नवऱ्याने शेवटचा श्वास घेतला.....
अवघा पाच वर्षांचा संसार वैशाली ने थाटला आणि तिचा खेळ मोडला. माहेरच्यानी दुसरा विवाह करण्याचा सल्ला दिला पण मुलांचे हाल नकोत म्हणून तिने तो निर्णय फेटाळला. ती तिथेच राहीली. कधी कधी होणारा छळ आता रोज होऊ लागला, डोळे आसवांनी भरून राहू लागले, पण मुलांचे तोंड बघत वैशाली सहन करत होते. सहन करण्याचा पण अंत बघितला आणि तिचे सोन्यासारखे मुलं तिच्या जवळून घरच्यांनी हिरावून घेतले, कोवळ्या मनास त्यांचे कपट समजले नाही, त्यांना ही आई नकोशी झाली.....हळूहळू छळ वाढू लागला आणि आता तर छळ विकोपाला गेला होता. तिने घरातून जाण्यासाठी नवनवीन युक्ती लढवल्या जाऊ लागल्या, तिने माहेरी राहावे यासाठी तिचे जगणे असह्य केले, पण तिने हार मानली नाही. यावेळी नशिबाला झुकवायचे हा अट्टहास केला होता. तीला घराबाहेर काढून दिले, आणि शेतीतून तिचा हक्क डालवला.....आता तिच्या खाण्याचा प्रश्न पडू लागला.. लोकांना दया येऊ लागली पण त्या दयेची भाकर तिला पचनी पडेना. शेवटी तिने एका दुकानात कामाला राहून पोटाची खळगी भरवण्याचा मार्ग स्वीकारला.... एक खोली काढली, वर पत्राचा आधार दिला आणि आपण मोडक आयुष्य तिने काढण्याचा निर्णय घेतला......तिने हार मानली नव्हती..पण आज स्वतःचेच मुलं जेव्हा दूर आहेत, त्यांना चोरून बोलावे लागते, पण आजही एक आशा आहेच.....
आणि ते मध्येच थांबल्या मुळे माझी तंद्री तुटली आणि मी कुतूहलाने विचारू लागली,
ती कोणती?????
तिचा मुलगा आणि मुलगी....
ते योग्य वेळेची वाट बघत आहेत. आणि ती त्यांची......
त्या काकूंनी आवंढा गिळला आणि म्हणाल्या.....
तुला लिहायचं असेल तर लिहशील नाही वाटले तर नको लिहुस...
एवढे बोलून त्या जाऊ लागल्या मी उठत त्यांना म्हणाले,
ज्यांनी एवढे दुःख भोगले,एवढी कळ सोसली आणि अजूनही कसरत ज्यांची चालूच आहे त्या वैशाली ला मला बघायला इच्छा आहे......
त्या मंद हसल्या आणि दोन पाऊले माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या...
" मीच ती अभागी ".......
माझे अंग अक्षरशः थरथरले..........
जाता जाता पुन्हा बोलून गेल्या..…..
मला माहित होते प्रिया बाहेर गेली, मी फक्त माझी कहाणी तुला सांगायला आले होते.....
असे म्हणत त्या निघून गेल्या.... आणि मी विचारात गुंतून गेली.......
" हीच का स्त्री "......
स्त्री स्वतंत्र आहे का आजच्या युगात ?
- लेखिका : तेजस्विनी प्र. राऊत
( कहाणी सत्यघटनेवर आधारित आहे,......सद्या भारतातील स्त्रियांची परिस्थिती व त्यांचे समाजातील स्थान या बद्दल तुमच्या समोर मांडव म्हणून मुद्दाम हा अनुभव तुमच्या पर्यंत पोहोचवत आहे.)
काही ओळी आठवल्या आणि लिहिल्य -
अग तलवार घे हाता......
ये बाई, किती अश्रू ढाळशील आता
घे रुमाल,पूस अश्रू अन तलवार घे हाता
रोज रोज तूच का म्हणून मरशील
बस झाले तुझे आता ,किती तू सहन करशील
आग ताट मानेने उभी रहा
नको झुकू कोणापुढे माथा
घे रुमाल, पूस अश्रू,अन तलवार घे हाता...
तूच तुझी रक्षक हो,
वाट कुणाची आता पाहू नको
अरे मुडदे पाड एकेकाचे
बलात्काराला बळी पडू नको
राणी लक्ष्मीबाई आपल्या होत्या
हे तू विसरू नको आता
अग घे रुमाल,पूस अश्रू अन तलवार घे हाता...
ऍसिड फेकलं ना तुझ्यावर
आता तुंही ऍसिड च फेक
अरे जाळलं तुझ्या देहाला
आता तुंही त्याला जाळून देख
घे कायदा तुझ्या हाती
अन दुर्गा रूप दाखवून दे आता
अग घे रुमाल, पूस अश्रू अन तलवार घे हाता....
अग कायदा तुझ्या हातात घे
त्याला जुजबी समजू नको
स्त्री रक्षणासाठी झालेत प्रयत्न
त्याला वाया जाऊ देऊ नको
अग झुंडी पुढे नमण्यापेक्षा
तुरुंगात जायला तयार हो आता
अग फेक रुमाल , पूस अश्रू अन तलवार घे हाता...
हातामधली बांगडी काढू नको
पण मनगटात बळ ठेव तू
अग पायातली चाळ काढू नको
पण लाथेत दम ठेव तू
कुणी आलाच ना समोर
तर घाबरू नको तू आता
अग फेक रुमाल, पूस अश्रू अन तलवार घे हाता.....
कवी
तेजस्विनी प्र. राऊत
आमच्या इतर लेख आणि गोष्टी :
१. दोघी...
२. छत्रपती शिवाजी महाराज : अभावातून प्रभावी स्वराज्याचे निर्माते.
३. स्री ... सामाजिक दृष्टिकोनाच बुजगावण
४. एक चिट्ठी...
उत्तम. समर्पक.
ReplyDeleteलिहत रहा.
आभार आपले😊
Delete